अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पण ठाकरे बंधूंची युती झाली नाही, तर हिंदी सक्ती विरोधात मिळालेला विजय साजरा करण्यासाठी दोघेही एकत्र येत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या स्वतंत्र पत्रकार परिषदेनंतर याबाबत संकेत मिळाले आहेत. ५ जुलै रोजी मुंबईमध्ये ठाकरे बंधू विजयी जल्लोष साजरा करणार आहेत, त्याची तयारी सुरू झाली आहे. ठाकरेंकडून तसे संकेत देण्यात आले आहेत.
हिंदी सक्तीवरून विरोधकांनी रान उठवल्यानंतर फडणवीस सरकारने एक पाऊल मागे घेत दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठाकरे बंधूकडून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी ५ जुलै ही तारीख निवडण्यात आली आहे. दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे दोघांच्या युतीच्या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, त्रिभाषा शिक्षणाचं स्वरुप स्वीकारल्यानंतर त्याच्या विरोधात मनसेचे प्रमुख राज ठाकरे व ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंधूनी आक्रमक होत रान पेटवले होते.
मराठी भाषेबाबत तडजोड होता कामा नये, सरकारने पुन्हा अशी चूक करायला नको, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले. सरकारमधील अनेकांचा हिंदी सक्तीला विरोध होता. ५ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये याबाबत आणखी काही बोलणार आहे. मोर्चाला पक्षीय लेबल लावू नका.राज ठाकरे


