मंत्री दत्ता भरणे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. या योजनेमुळे विकास निधी मिळण्यास उशीर होत असल्याचे दत्ता भरणे यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ यांनी योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असल्याची कबुली दिली आहे. याआधीही लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी मिळण्यासाठी विलंब होत असल्याचे म्हणत अनेकांनी खंत व्यक्त केली होती. पुण्यात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांच्या हस्ते लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण येत असल्याचे अमृता फडणवीस यांनीही मान्य केले.
‘लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत आहे. पण ही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकार आर्थिक ताण सहन करायला तयार आहे. मध्यंतरी काहीतरी फिल्टरेशन करावे लागेल’, असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पुणे दौऱ्यावर होते.
‘पुण्यात काही समस्या आहेत. काही गोष्टी नीट व्हायला हव्यात. रस्ते छान पाहिजे, वाहतूक स्मूथ पाहिजे. पुण्यात सामान्य माणूस सुखदायी जीवन जगू शकत नाही, तोपर्यंत देवेंद्रजी त्यांच्या पुण्याच्या फेऱ्या कमी करणार नाही. मला फक्त शहराच्या समस्या कळतात, त्या मी सांगू शकते. मी एक नागरिक आहे आणि नागरिकांच्या हिशोबाने बोलते’, असे अमृता फडणवीस यांनी वक्तव्य केले.


