देवेंद्र फडणवीस सरकारकडून पुन्हा एकदा प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सोमवारी ४ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारकडून जारी केले आहेत. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आयएएस अधिकारी पी. वेलरासू यांची आठवड्यात दुसऱ्यांदा बदली झाल्याने प्रशासकीय चर्चेला उधाण आलेय.
कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली?
पी. वेलरासू (२००२ बॅच) यांया १६ जून रोजीच्या बदली आदेशात अंशतः बदल करण्यात आला आहे. आता त्यांची ‘एमएमआरडीए’च्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. संजीव कुमार यांची मंत्रालयातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
एमएमआरडीए’चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे आता महापारेषणच्या (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जळगाव येथील तापी सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत बोरकर यांची जलसंपदा विभागात सचिव (प्रकल्प समन्वय) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात राज्य सरकारने आयएएस अधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची बीएमसीमधील अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदावरून एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून होणाऱ्या बदलीला स्थगिती दिली होती. राज्य सरकारने जोशी यांच्या जागी आयएएस अधिकारी प्राजक्ता वर्मा यांची बीएमसीमध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून होणाऱ्या नियुक्तीलाही स्थगिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जोशी विशेष सघन पुनरीक्षण (SIR) संबंधित काम पाहत होत्या आणि निवडणूक आयोगाची (EC) पूर्वपरवानगी न घेतल्याने त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली. जोशी बीएमसीमध्येच कार्यरत असल्याने, वर्मा यांना अद्याप कोणतीही नवीन नियुक्ती मिळालेली नाही आणि त्या प्रतीक्षेत आहेत.


