राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आज मोठी घडामोड घडली. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षप्रमुख शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची एकमताने नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. पाटील पक्ष सोडणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. अशातच केंद्रीय राज्यमंत्र्याने जयंत पाटील यांना महायुतीत येण्याची थेट ऑफर दिली.
जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांचं कौतुक केलं. तसेच महायुतीत येण्याची ऑफर दिली. ‘जयंत पाटील यांचं तिथे मन लागत नसेल, किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल, तर त्यांनी महायुतीसोबत यावं’, असं आठवले म्हणालेत. दरम्यान, जयंत पाटील त्यांची ऑफर स्वीकारणार का? हे पाहणं आता म्हत्वाचं ठरणार आहे.
‘जयंत पाटील हे कष्टालू आणि संघर्षशील नेते आहेत. पाटील यांनी राजीनामा दिला आणि त्यांना विकास करायचा असेल, तर त्यांनी सत्येसोबत यायला हवं’, असं आठवले म्हणाले. तसेच ‘राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोडणार असाल तर, मी मध्यस्थी करून त्यांना राष्ट्रवादीत (अजित पवार गट) आणायला तयार आहे’, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे वाळवा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी जयंत पाटील यांनी महायुतीत यावं, त्यांनी याबाबत विचार करावा, असं आठवले म्हणाले आहेत.


