‘गडकोटांच्या संवर्धनासाठी निधी द्या
संसदेत खासदार नीलेश लंके यांची घणाघाती मागणी
छत्रपतींच्या गड–किल्ल्यांच्या दुरावस्थेवर संसदेतून हल्लाबोल!
नवी दिल्ली : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले गड–कोट किल्ले आणि त्या परिसरातील ऐतिहासिक मंदिरे आज दुरावस्थेत आहेत. या संवेदनशील प्रश्नावर शुक्रवारी लोकसभेत थेट आवाज उठवत अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे निधीची ठामपणे मागणी केली.
आपल्या घणाघाती शैलीत बोलताना खा. लंके म्हणाले, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, आठरा पगड जातींचे मायबाप, दुरदर्शी आणि जनतेचे राज्यकर्ते असलेले छत्रपती शिवराय! त्यांनी उभारलेले गड–कोट किल्ले ही आपली श्वास-निःश्वासातली इतिहासाची मानमरातबाची ओळख आहे. पण आज ही किल्ल्यांची स्थिती पाहवत नाही.
छत्रपतींनी उभारलेले असंख्य गड–कोट किल्ले काळाच्या ओघात जीर्ण झाले आहेत. किल्ल्यांच्या परिसरातील पुरातन मंदिरेही भग्न अवस्थेत असून अनेक ठिकाणी पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा देखील नाहीत. या संवर्धनाची तातडीची गरज खा. लंके यांनी मांडली.
खासदार लंके यांनी सभागृहात स्पष्ट शब्दांत मागणी केली की, “गडकोट किल्ल्यांचे संवर्धन हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाच्या स्वाभिमानाचे कार्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने भरीव निधी मंजूर करून गड–कोट किल्ल्यांचे संरक्षण, दुरुस्ती आणि सुसज्ज पुनरुज्जीवन तातडीने करावे.”


