लग्न म्हणजे आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा आणि लक्षात राहणारा दिवस. त्या दिवशी नवरा-नवरीच्या चेहऱ्यावरचं हसू, घरातला उत्साह, नातलगांची गर्दी आणि प्रत्येक विधी खासच असते. म्हणूनच हे सगळे क्षण कायम लक्षात राहावेत म्हणून लोक फोटो-व्हिडीओंवर भरपूर पैसे खर्च करतात. पण, ज्या आठवणी आयुष्यभर जपायच्या, त्या जर काही क्षणांतच राखेत बदलल्या तर?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहून लोकांना असंच काहीसं पाहायला मिळालं आहे.हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नाचा आहे. या लग्नाचे सगळे फोटो काढण्याचं काम एका फोटोग्राफरनं केलं होतं. लग्न झाल्यावर त्याला त्याचे पैसे मिळणे बाकी होते; पण ठरलेली पूर्ण रक्कम त्याला मिळाली नाही.
त्याने अनेकदा सांगूनही नवरा-नवरी किंवा त्यांच्या घरच्यांनी पैसे दिले नाहीत, असं फोटोग्राफरचं म्हणणं आहे. त्याच रागातून त्यानं खूपच टोकाचं पाऊल उचललं.व्हिडीओमध्ये रस्त्याच्या बाजूला पेटवलेली आग दिसते. त्या आगीत तो त्या लग्नाचे एकामागोमाग एक फोटो अल्बम टाकताना दिसतो. त्या अल्बममध्ये नवरदेव-नवरीचे हसरे फोटो, मंगलाष्टकांचे गोड क्षण, हळदी आणि लग्नाचे सगळे खास विधी, अशा अनेक आठवणी दडलेल्या आहेत.
पण काही वेळातच त्या फोटोंमध्ये दडलेल्या सगळ्या आठवणी आगीत जळून खाक होतात. आजूबाजूला उभे असलेले लोक हे सगळं पाहून थक्क झाल्याचे दिसते. व्हिडीओखाली असं लिहिलं आहे, “फोटोग्राफरकडे इतकं दुर्लक्ष करू नका की, शेवटी अल्बम जाळायची वेळ येईल.”हा व्हिडीओ princekumhar633 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे.
काही जणांनी फोटोग्राफरचं समर्थन केलं; तर काहींनी त्याच्यावर टीकाही केली. एका युजरनं लिहिलं, “नवरदेव-नवरीचं काही बिघडलं नाही; पण फोटोग्राफरनं स्वतःचंच नुकसान केलं.” दुसऱ्यानं म्हटलं, “हे शेवटचं पाऊल असायला हवं होतं.” तर काहींनी थेट फोटोग्राफरचं समर्थन करीत लिहिलं, “भाऊनं योग्य केलं, मेहनतीचे पैसे वेळेवर द्यायलाच हवेत.”


