सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा आरोग्यविषयक तक्रारी नियमितपणे जाणवत असतात. अशा नियमित तक्रारींवर हमखास घेतल्या जाणाऱ्या किंवा डॉक्टरांकडून लिहून दिल्या जाणाऱ्या एका औषधावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या औषधाचं १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त सेवन आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार निमेस्युलाईड (Nimesulide) या घटकाची १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त मात्रा असणाऱ्या सर्व औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. “निमेस्युलाईडचं प्रमाण १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त असणाऱ्या औषधांचं सेवन केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो याबाबत केंद्र सरकारची खात्री पटली आहे. या औषधांना पर्यायी औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे जनहितार्थ निमेस्युलाईडचं १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त प्रमाण असणारी औषधं निर्माण करणं, विक्री करणं किंवा वितरित करणं यावर बंदी घालण्यात येत आहे”, असं आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
Nimesulide वर बंदी घालण्याची शिफारस इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च अर्थात ICMR नं केंद्र सरकारला केली होती. या औषधामुळे यकृतामध्ये इन्फेक्शन होत असल्याची काही प्रकरणं समोर आली होती. यासंदर्भात आयसीएमआरनं केलेल्या शिफारशी केंद्रीय औषध नियंत्रक संस्थेकडून मान्य करण्यात आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे.


