१ जानेवारी रोजी साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्याहस्ते ध्वजारोहणाने साहित्य संमेलनास प्रारंभ झाला. शुक्रवारपासून पुढचे चार दिवस हे संमेलन चालणार आहे. मात्र, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या ‘संभाजी’ कादंबरीमुळे वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणावर खुद्द विश्वास पाटील यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली असून काही वादग्रस्त संदर्भ आढळला, तर तो मागे घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
शुक्रवारी साहित्यस संमेलनाला सुरुवात होण्याआधी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत प्रतिक्रिया दिली. “आंदोलक माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. माझी कादंबरी २००६ साली प्रकाशित झाली आहे. सोलापूरच्या साहित्य संमेलनात त्याच्या ३५०० प्रती खपलेल्या आहेत. दोन-तीन पिढ्यांनी ते वाचलेलं आहे. तरी संभाजी ब्रिगेडच्या माझ्या तरुण मित्रांना काही शंका असल्या तर आम्ही एकमेकांसमोर बसून मार्ग काढण्याचं ठरवलं आहे”, असं विश्वास पाटील म्हणले. दरम्यान, संभाजी कादंबरीत काही आक्षेपार्ह असल्यास ते मागे घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. “शेवटी संभाजी राजे हे माझ्या काळजाचा कण आहेत. त्यामुळे अनवधानाने माझ्याकडून एखादा शब्द चुकून वेगळा झाला असेल आणि ते माझ्या लक्षात आलं तर तो मोठ्या मनानं तात्काळ मागे घेम्याचीही माझी तयारी आहे”, असं विश्वास पाटील म्हणाले.
‘संभाजी’ कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडनं केला आहे. ‘संभाजी’ कादंबरीत ऐतिहासिक पुराव्यांचा अभाव असून संभाजी महाराजांचं प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला. तसेच, ऐतिहासिक नोदींमध्ये संभाजी महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्याचा कोणताही उल्लेख नसल्याचाही दावा संभाजी ब्रगेडनं केला आहे.


