अहिल्यानगर -राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी निर्माण झालेले वातावरण पाहता सर्व महापालिकांमध्ये युतीची सत्ता येईल व जास्तीत जास्त महापौर युतीचेच होतील अशी शयता आहे. महापालिकेच्या विकासासाठी केंद्र व राज्य प्रमाणे अहिल्यानगर महानगरपालिकेतही युतीच्या विचाराची सत्ता येणे आवश्यक आहे. अहिल्यानगर मध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप तसेच दोन्ही पक्षांचे पदाधिकारी निवडणुकीसाठी चांगले उत्कृष्ट नियोजन करत आहेत. शहर स्मार्ट व्हावे आधुनिक इन्फ्रास्ट्रचर नगर मध्ये यावे यासाठी केंद्र व राज्य सरकार निधी देत आहे. त्यामुळे जनतेने भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्याच मागे उभे राहावे. अहिल्यानगर शहरात युतीचाच महापौर बसवण्याची जबाबदारी मी सर्व जनतेवर देत आहे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात महाआरती करून व नारळ वाढवून झाला. त्यावेळी ते दिल्ली गेट येथील सभेत व प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंधारण मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ.संग्राम जगताप, भाजपचे महामंत्री वीजय चौधरी व रवींद्र अनासपुरे, निवडणूक प्रमुख आ.विक्रमसिंह पाचपुते, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, विनायक देशमुख, सुनील रामदासी, माणिकराव विधाते यांच्यासह दोन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी माळीवाडा ते दिल्लीगेट अशी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅलीमध्ये जीपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप होते. दिल्ली गेट येथे प्रचार रॅली आल्यावर त्या ठिकाणी विरात सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप यांनीही मनोगत व्यक्त करून महानगरपालिकेत युतीचाच महापौर होणार असल्याचे सांगत भाजपा राष्ट्रवादी युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन केले.अहिल्यानगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादी युतीच्या उमदेवारांच्या प्रचाराचा नारळ सोमवारी फोडण्यात आला. यावेळी माळीवाडा वेस ते दिल्लीगेटपर्यंत रोड शो करण्यात आला. या रोड शोमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्यासह पदाधिकारी, उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युतीने शहात जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने महापालिका निवडणुकीत चर्चेला उधाण आले आहे.
भाजप-राष्ट्रवादी युतीचा नगरमध्ये रोड शो अहिल्यानगरचा महापौर युतीचाच ; भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
- Advertisement -


