अहिल्यानगर -शहरातील माळीवाडा परिसरातील कपिलेश्वर चौकात धंद्याच्या वादातून राडा झाल्याची घटना घडली. लोखंडी फायटरने तरुणावर हल्ला केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अनिल रमेश आरडे ( रा. शिंदे गल्ली, माळीवाडा, जि. ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रमोद साठे, अभिजित साठे, प्रशांत साठे सर्व ( रा. माळीवाडा, जि,. ता. अहिल्यानगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनिल रमेश आरडे यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते शिवम सायकल दुकानाच्या ओट्यावर बसलेले असताना, ओळखीचा प्रमोद दिनकर साठे तेथे आला. ’आमच्या धंद्याकडे का येतो?’ असे म्हणत त्याने आरडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच अभिजित साठे, प्रशांत साठे आले. यावेळी प्रशांत साठेने हातातील लोखंडी फायटरने आरडे यांच्या डाव्या डोळ्यावर प्रहार केला. तसेच इतर दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरडाओरडा झाल्याने स्थानिक नागरिक मदतीला धावून आले असता, तिन्ही आरोपी तेथून पळून गेले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार औटी करत आहेत.
शहरातील सारसनगर परिसरातील तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सारसनगर पुलाजवळ दारू पिण्याच्या वादातून सदरचा प्रकार घडला. जखमी गणेश नितीन गायकवाड (वय 26, रा. भगवानबाबा चौक, सारसनगर) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सारसनगर पुलाजवळ दि. 15 जानेवारी रोजी रात्री जखमी गणेश गायकवाड यांना मयूर छबुराव कांडेकर व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी अडवले. ’तू दुसऱ्या धंद्यावर दारू पिण्यासाठी का जातो?’ असा जाब विचारत आरोपींनी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.आरोपींनी गणेश गायकवाड यांनाअर्वाच्य शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याच दरम्यान एका आरोपीने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्या पाठीवर सपासप वार केले. झटापटीत त्याच्या खिशातील रोकडही गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धर्मनाथ पालवे करत आहेत.
द्वारकाधीश कॉलनीतील कुटुंबावर जीवघेणा हल्ला
भिंगार परिसरातील आलमगीर येथील द्वारकाधीश कॉलनीतील एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात निखिल देवीराम धुलिया ( रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार जि. ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नरेंद्र गजानन कनोजिया, पारस गजानन कनोजिया, ऋतिक धीरज परदेशी, ज्योती गोपीचंद कनोजिया, ममता अजय परदेशी आणि सागर उर्फ विकी गोपीचंद कनोजिया सर्व ( रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार जि. ता. अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून वरील आरोपींनी कुटुंबावर बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला केला. आरोपींनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करून फिर्यादीच्या आई-वडिलांना आणि बहिणीला बेदम मारहाण केली. यावेळी पारस कनोजिया याने ’तुला कायमचा संपवतो’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर करत आहेत.


