*भोंदूबाबा प्रकरणामुळे खासदार निलेश लंके चर्चेत; माढा तालुक्यातील भोंदूबाबा नानासाहेब विरकरचा आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल*
नाशिक जिल्ह्यात खरात प्रकरण अजूनही ताजेच असताना, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली.माढा तालुक्यातील आहेगाव येथे दरबार भरवणारा कथित भोंदूबाबा नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली महाराज आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. भोंदूगिरी, फसवणूक आणि आर्थिक लुबाडणुकीसह विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणात आता आणखी एक खुलासा झाला असून खासदार निलेश लंके आणि भोंदूबाबा नानासाहेब विरकर याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे.यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली असून भोंदू बाबा वीरकर आणि शरदचंद्र पवार गटाचे खासदार लंके यांच्यातील जवळीक घट्ट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुरु माऊली महाराज हा आहेगाव येथील स्वतःच्या पाच एकर जागेत एसी दरबार भरवत होता. दरबारात आलेल्या भक्तांनी फक्त नाव सांगितल्यानंतर त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक आणि खात्यातील शिल्लक रक्कम अचूक सांगत असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे अनेक भाविक त्याच्याकडे आकर्षित होत होते.दरम्यान, खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांचे या गुरुमाऊलीसोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेषतः या भोंदू बाबाचा आशीर्वाद घेताना निलेश लंके थेट खाली वाकलेले फोटोमध्ये दिसून येत आहेत.राणी लंके जिल्हा परिषद सदस्य असताना गुरुमाऊली भक्त परिवाराने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचा फोटो समोर आला आहे. तसेच एका फोटोमध्ये खासदार निलेश लंके यांनी गुरुमाऊलीला शाल घालून सन्मान केल्याचे दिसत आहे. आणखी एका छायाचित्रात ते गुरुमाऊलीच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेताना दिसत असल्याने या प्रकरणाची चर्चा अधिक रंगली आहे.
खासदार निलेश लंके यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये “करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम” अशी कॅप्शन देत गुरुमाऊलीचा आशीर्वाद मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे आता या फोटो आणि पोस्टवरून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.स्थानिक स्तरावर गुरुमाऊलीबाबत अनेक दावे केले जात होते. बंगालमध्ये सात-आठ वर्षे राहून त्याने “काळी विद्या” शिकल्याची चर्चा होती. तसेच तो स्वतःला हनुमानाचा अवतार असल्याचे सांगत असल्याचाही दावा केला जात आहे.राजकारणात विजय मिळवून देण्याची क्षमता असल्याचे तो सांगत असल्याने, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्याचा काही प्रभाव होता का, अशा चर्चाही आता सुरू झाल्या आहेत. मात्र, या सर्व दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
पोलिस तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे.


