अहिल्यानगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसाय, कला केंद्र (डान्स बार) व लेडीज वेटर सर्व्हिस त्वरित व कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात, या मागणीसाठी (दि. ९ फेब्रुवारी २०२६) सकाळी १० वाजता ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. नगर तालुका पोलिसांच्या नाकावर टिच्चून अन अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे सुरु असलेले नाजूक व्यवसाय तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. नाजूक व्यवसायाबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अवैध व्यवसायांबाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदने, पत्रव्यवहार तसेच ग्रामसभेचा ठराव देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात २६ जानेवारी २०२६ रोजी पोलीस प्रशासनास लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यानंतर दहा दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला. रुईछत्तिसी हे गाव बाजारपेठेचे असून येथे महाविद्यालये व शैक्षणिक संस्था आहेत. या अवैध व्यवसायांमुळे विद्यार्थ्यांवर तसेच गावातील तरुण-तरुणींच्या भविष्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद होत नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास नगर-सोलापूर महामार्गावर तीव्र आंदोलन करण्याचा आणि वेळप्रसंगी आत्मदहनचा टोकाचा निर्णय घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.दरम्यान, उपोषणाची दखल घेत पोलीस उपअधीक्षकांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी संबंधित अवैध व्यवसायांवर कारवाई करून ते सीलबंद केले जातील व यापुढे असे व्यवसाय चालू दिले जाणार नाहीत, असे आश्वासन दिले.
ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या
सोलापूर महामार्गावर नगर तालुक्याच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून अवैध व्यवसाय सुरु आहेत. संबंधित व्यवसाय बंद करण्याची ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली. दरम्यान ग्रामसभेनंतर नाजूक व्यवसाय बंद झाले आहेत. संबंधित अवैध वेश्याव्यवसायावर पिटा कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी बंद करावे, गावामध्ये कायमस्वरूपी रात्रीची नियमित गस्त, संशयित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बससावेत, ग्रामस्थ-पोलीस यांची संयुक्त समिती स्थापन करावी. गावात आढळलेल्या बांगलादेशी महिलांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. अवैध व्यवसायांना सहकार्य करणार्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी करून निलंबन करण्यात यावे, विभागीय चौकशी करावी. एसपींनी संबंधीत व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची लेखी हमी द्यावी अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. यावर पोलिस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


