अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची भूमिका घेतली. उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होताच सुनेत्रा पवार अजितदादांप्रमाणे कामाला लागल्या आहेत. मात्र अजित पवार यांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी शपथविधी पार पडल्याने विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नावर राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आज सडेतोड उत्तर दिलेत. साम टीव्हीच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात सुनिल तटकरे यांनी बारामती विमान अपघात आणि सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत रोखठोक भूमिका मांडली.
राजकारणात काही निर्णय वेळेवर घ्यावे लागतात. त्याच योग्यवेळी निर्णय घेण्याची क्षमता आम्ही सामुहिकरित्या दाखवली. आणि ४० आमदारांनी एक मतांनी सुनेत्रा वहिनींची विधीमंडळ नेत्या म्हणून निवड केली. पण यामुळे आम्हाला कोणी खलनायक म्हणत असेन तर आम्ही त्यांना काळाच्या ओघात उत्तर देऊ असं तटकरे म्हणालेत.
अजित पवार यांच्या अकाळी निधनानंतर पक्षात पोकळी निर्माण झाली होती. अजितदादांच्या अनोख्या शैलीमुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठं यश मिळालं. ज्यावेळी अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष झाले, त्यानंतर मला प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं. त्यावेळी २०२४मध्ये ५९ पैकी ४१ जागा निवडून आल्या, त्यामुळे त्या आमदाराच्या पक्षालाच त्याचा नेता निवडण्याचा अधिकार असेन. आम्ही घड्याळाच्या चिन्हावर निवडणून आलो. त्यामुळे काहीचे वैयक्तिक राजकीय हेतू असेल तो पूर्ण झाला नसेल त्यामुळे ते दुखावले गेले त्यामुळे आम्हाला खलनायक ठरण्यात आलं.यावर बोलताना तटकरे म्हणाले, याआधीही पक्षातून माझ्यावर टीका झाली. आता जे माझ्यावर असे बेछुटपणे आरोप करत आहेत त्याचा निषेध करतो. अजित पवार यांच्यासोबत ४० वर्ष मी काम केलं आहे. ज्यावेळी अजित पवार लोकसभेवर निवडून गेले होते. त्याआधी ते जिल्हा मध्यवर्ती बँकेची तयारी करत होते, त्यावेळीही पक्षातून माझ्यावर टीका करण्यात आली होती. आता त्यावर बोलणार नाही.
ज्यावेळी अजित पवार यांनी २०२३ मध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी त्यांच्यासोबत आम्ही होतो. एनडीएसोबत जाण्याचा निर्णय हा एका दिवसात होत नाही. २०१४मध्येही भाजपला बाहेर पाठिंबा दिला होता. २०१६-१७ मध्ये आम्ही भाजपसोबत जाणारच होतो, त्यावेळी सर्व तपशील ठरवला होता.
त्यादरम्यान अनेक घटना घडला, पण तेव्हाही ते शक्य झाले नाही. २०१९मध्येही आपण भाजपसोबत जावं असं मत अजितदादांनी मांडलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेच्यावेळी शपथविधी झाला होता. त्यावेळी अजितदादांचे म्हणणं होतं की, या राज्यात दोन पक्षाचे सरकार स्थिर राहील.
आणि केंद्रात भाजपच सरकार होतं,तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपसरकार सोबत गेलं तर स्थिर सरकार मिळाले असते शिवाय राज्याचा विकास करण्याची संधी मिळाली असती, असं अजितदादांचे मत होतं. पण ते त्यावेळी झाले नाही. २०२३मध्ये ज्यावेळी अजितदादांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली त्यावेळी आम्ही दादांच्या पाठीमागे उभे राहिलो. त्यावेळीही आमच्यावर टीका झाली.
२००९ मध्ये जेव्हा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी माझ्या मेघदूत बंगल्यावर आमदारांची बैठक झाली तेथे त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यावेळेपासून माझ्यावर आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर आक्षेप घेण्याची मोहीम सुरु झाली.


