एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. ‘राजकारण हे निवडणुकांपुरतं असते. पदाला चिकटून राहणारा मी नाही. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही, असं जाहीर वक्तव्य दिपक केसरकर यांनी केल आहे. केसरकर यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्यावरून केसरकर यांनी पुन्हा राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याचं पाहायला मिळत आहे.सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात दिपक केसरकर यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या कार्यक्रमात दिपक केसरकर म्हणाले, ‘निवडणुका आल्यावर विरोधकांना थोडी भीती वाटणार आहे. पण भीती बाळगू नका. मी तुम्हाला सांगतो, जनतेची शक्ती कोणी ओळखू शकत नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी ओळखली नाही. त्यामुळे पक्ष बदलावा लागला. पण कुठेही गेलो तरी निवडून आलो.
‘सगळ्यात मोठं काय आहे तर जनता आहे. आपण जनतेबरोबर राहा. जनता तुमच्याबरोबर राहते. स्वार्थासाठी राजकारण करू नका. लोकांसाठी राजकारण करा. तुम्ही ते राजकारण केल्यास आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही. मी आयुष्यात कोणतीही निवडणूक हरलो नाही. मी आयुष्यभर जिंकलो. खरंतर मी जिंकलो नाही. तर जनता जिंकली, असे ते पुढे म्हणाले.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी देखील दिपक केसरकरांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. केसरकर म्हणाले होते, ‘ही माझी शेवटची निवडणूक आहे. पुढील काळात माझा राजकीय वारसदार तयार व्हायलाच लागेल. तो माझा नव्हे तर पक्षाचा वारसदार असेल. माझी मुलगी राजकारण येणार नाही. तर समाजकारण करेल. माझी मुलगी चांगली उद्योजिका बनेल’.
दिपक केसरकर यांनी पुन्हा निवृत्तीबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दिपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहावे लागेल.


