एमआयडीसीमध्ये औद्योगिक गॅस टंचाईचा प्रश्न गंभीर
आमी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर -जयद्रथ खाकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर एमआयडीसी औद्योगिक वसाहतीमध्ये निर्माण झालेल्या औद्योगिक गॅस टंचाईच्या गंभीर प्रश्नाबाबत असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅनुफॅक्चरिंग इंडस्ट्रीज (आमी) संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी पंकजा आशिया यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उद्योजकांच्या विविध गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी बैठकही आयोजित करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योगांना औद्योगिक गॅसच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. उत्पादन प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असणारा गॅस अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अनेक उद्योगांचे उत्पादन व्यवस्थापन विस्कळीत होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक म्हणून गॅसचा वापर केला जातो. मात्र सध्या नियमित व पुरेसा पुरवठा होत नसल्याने उत्पादन प्रक्रियेत वारंवार अडथळे निर्माण होत आहेत.
यामुळे उद्योगांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत असून ठरलेल्या वेळेत ग्राहकांना माल पुरविणेही कठीण होत आहे. परिणामी उद्योगांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, उद्योगांच्या विश्वासार्हतेवरही परिणाम होत असल्याची चिंता उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योगांमध्ये हजारो कामगार कार्यरत आहेत. गॅस टंचाईची ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास उत्पादन घटणे, कामगारांना काम बंद पडणे तसेच काही उद्योगांना तात्पुरते किंवा कायमस्वरूपी उत्पादन बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याचा थेट परिणाम स्थानिक रोजगार, अर्थव्यवस्था आणि औद्योगिक विकासावर होऊ शकतो. अहिल्यानगर जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर असलेला जिल्हा असून राज्य सरकार उद्योगवृद्धीसाठी विविध धोरणे व सवलती देत आहे. मात्र अशा मूलभूत इंधन पुरवठ्यातील अडचणीमुळे उद्योगांच्या प्रगतीला गंभीर अडथळे निर्माण होत असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन संबंधित गॅस पुरवठादार कंपन्यांशी समन्वय साधून गॅसचा नियमित व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा तसेच भविष्यात अशा प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये. यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
या वेळी आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, सतीश गवळी, राजेंद्र शुक्रे, संदेश पिंपळकर, मिलिंद कुलकर्णी, गणेश कोलार, रामचंद्र भट, नागराज बडगिरी, प्रवीण खपके प्रफुल्ल नातू, सिद्धार्थ संकलेचा, बालकृष्ण नरोडे, रोहन गांधी, आदी उपस्थित होते.
नगर एमआयडीसीमध्ये उद्योजकात चिंता औद्योगिक गॅस टंचाईचा प्रश्न गंभीर,उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर
- Advertisement -


