आसाम आणि पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजता विज्ञान भवन येथे पत्रकार परिषद बोलावली आहे. या परिषदेत निवडणूक आयोग या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडुकीची घोषणाही आज होऊ शकते. त्यामध्ये अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे. दोन्ही नेत्यांचे अकाली निधन झाल्यामुळे या जागा रिक्त आहेत. आज या ठिकाणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते.
आसाम विधानसभेचा कार्यकाळ २० मे रोजी संपुष्टात येणार आहे. तर केरळचा २३ मे रोजी, तामिळनाडूचा १० मे रोजी संपणार आहे. पश्चिम बंगालचा ७ मे रोजी आणि पुद्दुचेरीचा १५ जून रोजी कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे ७ मे २०२६ आधी या राज्यातील निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत.आसाममध्ये झालेल्या मागील निवडणुकीत १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले होते. या निवडणुकीत एनडीएने बाजी मारली होती. एनडीएने ७५ जागा जिंकल्याल्या होत्या. आसामध्ये भाजप सलग दुसऱ्यांदा सत्तेत आले होते.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली होती. २९४ जागांपैकी ममता बॅनर्जी यांनी २१५ जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपने ७७ जागा जिंकल्या होत्या. बंगालमधील मतदान ८ टप्प्यात झाले होते.
तामिळनाडूतील २३४ विधानसभेच्या जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. द्रमुकने १३३, अण्णाद्रमुकने ६६ आणि भाजपने ५ जागा जिंकल्या होत्या. एमके स्टॅलिन मुख्यमंत्री झाले होते.
केरळमध्ये १४० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. एलडीएफने ९९ आणि यूडीएफने ४१ जागा जिंकल्या होत्या. पिनारायी विजयन सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते.
पुद्दुचेरीतील विधानसभेच्या ३० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. एनडीएने १६, तर यूपीएने ९ जागा जिंकल्या होत्या.


