राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवीदान समारंभ आज पार पडतोय. राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, कृषीमंत्री दत्ता भरणे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींची या कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून सन्मान करण्यात आलाय. राज्यपालांच्या हस्ते ही पदवी देवून मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आलाय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता डॉक्टर देवेंद्र फडणवीस झाले आहेत.
मला डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान केली. कुलपती, कुलगुरूंचे मनापासून आभार. ज्यावेळी मला विचारणा झाली, तेव्हा पदवी घ्यावी की नाही असा प्रश्न होता. कारण कृषी क्षेत्रात अजून खूप समाधानकारक काम करायचे आहे. मात्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ नावाजलेले आहे, त्यामुळे पदवीसाठी नाही म्हणू शकलो नाही. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.शेतीचे क्षेत्र खूप महत्वाचे आहे. गेल्या दहा वर्षात आम्ही यात खूप बदल करण्याचा प्रयत्न केलाय. पूर्वी कृषी क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोण मर्यादित होता. मात्र आता कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा विचार आम्ही केलाय. आपण जलयुक्त शिवार सारखी योजना आणली. राज्यात पाणी पातळी वाढल्याचा केंद्र सरकारचा अहवाल आहे. शेतकऱ्यांना वॉटर सिक्युरिटीसह ऊर्जा सिक्युरिटी देणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही सोलर योजना आणली. या वर्षाच्या शेवटपर्यंत 14 हजार मेगावॉट वीज तयार होईल. आज घडीला 65 शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळतेय. अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.वातावरणातील बदल, हे शेती समोरील सर्वात मोठे संकट आहे. हे वर्ष अलनिनोचे आहे. त्यामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे उत्पन्नावर मोठा परिणाम होतोय. वातावरणाचा परिमाण होणार नाही, असे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. आपली माती खराब होणार नाही, यासाठी संशोधन गरजेचे आहे. 78 टक्के शेतकरी अल्पभूधारक असून 10 हजार गावांमध्ये क्लायमेट फ्रुफ शेती सुरू आहे. कृषी तंत्रज्ञानावर आधारित उद्योग उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यात 1 कोटी 30 लाख शेतकऱ्यांचे डिजिटायझेशन करणारे महाराष्ट्र देशातील अव्वल राज्य आहे. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


