महाराष्ट्रातील निवडणुकांचा गुलाल उधळून झाल्यानंतर आता पुढील तीन वर्षे राज्यात कुठल्याही मोठ्या निवडणुकांची बिगुल वाजणार नाही. मात्र, देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जात असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा केली. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू आसाम, पुद्दुचेरी आणि केरल राज्यात निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. विशेष म्हणजे या 5 राज्यांच्या निवडणुकांसह महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकांचीही तारीख जाहीर करण्यात आलीय. त्यानुसार, प. बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत असून 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
माझ्या प्रिय मतदारांनो, गेल्या काही दिवसात निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचा दौरा केला, तयारीचा आढावा घेतला. आयोगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची भेट घेतली, त्यांच्या सूचनांचा स्वीकार केला. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, IG, DG यांची भेट घेतली. प्रशासनाने SIR साठी केलेल्या कामगिरीबद्दल BLO चे अभिनंदन केल्याचं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं. निवडणुका होत असलेले पाचही राज्य भौगोलिक आणि सांस्कृतिक भारताच्या विविधतेचं प्रतिनिधित्व करतात, असे म्हणत त्यांनी मतदारसंख्या आणि मतदान कर्मचारी, यंत्रणा याबाबत माहिती दिली.आसाममध्ये सर्व 125 मतदारसंघात एका टप्प्यात तसेच केरळमध्येही 140 विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 9 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. तामिळनाडूतील 234 विधानसभेसाठी एका टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात 152 आणि 142 मतदारसंघात अनुक्रमे 23 आणि 29 एप्रिल मतदान होणार आहे. या सर्व विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी होणार आहे.
राहुरी व बारामती विधानसभा पोटनिवडणुकिसाठी २३ एप्रिलला मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी : ३० मार्च २०२६
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : ०६ एप्रिल २०२६
अर्जांची छाननी : ७ एप्रिल २०२६
अर्ज मागे घेण्याची मुदत : ०९ एप्रिल २०२६
मतदानाची तारीख : २३ एप्रिल २०२६
मतमोजणी : ४ मे २०२६
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : ०६ मे २०२६


