महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना ऊन्हाचा तडाखा बसत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात उष्मघातामुळे अनेकांनी जीव गमावले आहेत. नगरच्या पारनेर तालुक्याच्या ढवळपुरीत उन्हाच्या तडाख्यामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हर्षदा रावसाहेब चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. पारनेर तुक्यातील ढवळपुरीत राहणाऱ्या हर्षदा या शेतात काम करत होत्या. दुपारच्या कडक उन्हात मका कापताना चक्कर येऊन ४६ वर्षीय हर्षदा कोसळल्याने त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. बीड जिल्ह्यातील तापमान 42 अंश सेल्सिअसच्यावर असून अति उष्णतेमुळे आणि उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील रस्ते आणि वर्दळीचे ठिकाणी शुकशुकाट दिसतेय. थंड पेयाच्या दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना दिसतेय. बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामधील तापमान 42 अंश सेल्सिअसच्यावर असून अति उष्णतेमुळे उष्माघात थकवा जाणवणे असे प्रकार सुरू होत आहेत.
विविध जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वाधिक तापमानाच्या शहरात वर्धा दुसऱ्या क्रमांकवर पोहोचलं आहे. वर्धा जिल्ह्याचे आजचे तापमान 45°C इतके आहे. भारतात पहिल्या क्रमांकवर छतीसगड राज्याचे राजनांदगांव तर दुसऱ्यावर महाराष्ट्राचा वर्धा शहर पोहोचलं आहे.
आज आणि उद्या वर्धेला उष्णलाटेचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील एका आठवड्यापासून वर्धेचे तापमान 44 ते 45 अंशच्या घरात आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिल महिण्यातच जिल्ह्याच्या तापमानाने उच्चांक गाठले आहे. वाढत्या तापमान पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.


