जनगणना तसेच मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणी मोहीम (एसआरआय) या कामांची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या सरकारकी कामांसाठी कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून राज्य सरकारने यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या रोखल्या आहेत. ग्रामविकास विभागाकडून याविषयीचे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
केंद्र सरकारने २०२७ च्या जनगणनेचे देशव्यापी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल. तर १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत गणना केली जाईल. या दरम्यान सुमारे २ लाख ६४ हजार प्रगणक आणि पर्यवेक्षक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन डिजिटल पद्धतीने माहिती संकलित करणार आहेत.
त्याचप्रमाणे एसआयआरसाठीही शिक्षकांना आदेश काढण्यात आले असून त्याची जबाबदारीही शिक्षकांवरच सोपविण्यात आली आहे. ज्यांना जनगणनेचे काम देण्यात आले आहे त्यांना एसआयआरचे काम देण्यात येणार नाही, असेही सरकारकडून सागंण्यात आले आहे. मात्र काही शिक्षकांना दोन्ही कामांचे आदेश प्राप्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील जनगणना तसेच एसआरआय कामाशी संबंधित क आणि ड वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व जिल्हा परिषद शिक्षकांची यंदा बदली न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाच्या उपसचिव वैशाली डिगे यांनी शुक्रवारी यासंदर्भातील पत्र सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. केंद्रीय गृह सचिवांच्या अर्धशासकीय पत्राच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने कर्मचारी, शिक्षकांच्या बदल्यांबाबत हा निर्णय घेतला आहे.
जनगणना कामाशी संबंधित क आणि ड वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व शिक्षक यांची सन २०२६ ची बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने बदल्या होतात. मात्र, जनगणनेमुळे यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या यंदा बदल्या नाही; ग्रामविकास विभागाचे आदेश
- Advertisement -


