सहकारी संस्थांचा कणा समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातच काही दिवसांपासून सहकाराला ओहोटी लागल्याचे चित्र आहे. लेखापरीक्षण नाही, व्यवहार नाहीत, संस्थेचा पत्ताही सापडत नाहीत, अशा वेगवेगळ्या कारणांनी आतापर्यंत तब्बल 651 सहकारी संस्था अवसायानात काढण्यात आल्या असून, गत वर्षभरातच 165 संस्थांवर अशी कारवाई झाली आहे.
दरम्यान, यातील 229 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून ‘त्या’ पतसंस्थांमधील घोटाळ्यांमुळे सहकार विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक संस्था कागदावर दिसतात, मात्र त्या शोधूनही सापडत नाहीत. सहकार विभागाच्या नोंदीनुसार, गेल्या काही वर्षांत सहकार कायद्याचा भंग करणाऱ्या काही संस्था निष्क्रिय झाल्या आहेत. त्यांच्यावर टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.2024-2025 पर्यंत अशा 486 संस्थांवर अशी कारवाई केली आहे. तर 2025-26 या वर्षभरात आणखी 165 संस्था अवसायानात काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 651 संस्थांना टाळे लागले आहेत. या संस्थांना अवसायनात आणण्यामागे विविध कारणे पुढे येत आहेत. त्यात ऑडिट रिपोर्ट सादर न करणे, वेळेवर नोटिशीला उत्तर न देणे, संस्था स्थापन केल्यापासून व्यवहार न करणे, आवश्यक माहिती देण्यास टाळाटाळ करणे, अशा अन्य काही गंभीर त्रुटींचा यात समावेश आहे.
संबंधित संस्थांवर जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनात अवसायनात काढण्याची कारवाई केली जाते. त्यावर अवसायक नेमून पुढील कार्यवाही केली जात आहे. 651 पैकी 229 संस्थांना दोषी ठरवत त्यांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. केवळ 10 संस्था पुन्हा सुरू झाल्या आहेत. सहकार क्षेत्र अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे नगरच्या सहकार विभागाकडून सांगितले जाते.


