इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा दुसरा भाग ११ मेपासून विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. तर प्रवेशाची तात्पुरती गुणवत्तायादी १५ मे रोजी, तर पहिली गुणवत्तायादी २६ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
गतवर्षीपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचण येऊ नये यासाठी शिक्षण संचालनालयाने १० एप्रिलपासून अर्जाचा भाग १ भरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ८ मेपर्यंत ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थांनी प्रवेश अर्जाचा भाग १ भरून नोंदणी केली आहे. दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींकरिता विशेष पाचवी फेरी राबविण्यात येणार आहे.
प्रवेश प्रक्रियेचे जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ८ ते १० मे या कालावधीत विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग १ ऑनलाइन सादर करता येईल. ११ ते २० मेदरम्यान शून्य फेरी राबविण्यात येणार आहे. व्यवस्थापन, इन- हाऊस, अल्पसंख्याक कोट्यासाठी ११ ते १३ मेदरम्यान विद्यार्थ्यांना शून्य फेरीसाठी अर्जाचा भाग २ भरता येणार आहे.
१५ मे रोजी तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर करण्यात येईल. या गुणवत्तायादीवर १६ मे रोजी विद्यार्थ्यांना हरकती सादर करता येणार आहेत. १८ मे रोजी सर्वसाधारण गुणवत्तायादी अंतिम करण्यात येणार आहे. तसेच शून्य फेरीसाठी जागांचे वाटप करण्यात येणार आहे. २० मे रोजी पहिल्या फेरीसाठी कोट्यांच्या जागांसह रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे.पहिल्या फेरीला २१ मेपासून सुरुवात होणार असून, २१ ते २२ मेदरम्यान विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग १ मध्ये बदल करणे, भाग २ भरता येणार आहे. त्यानंतर २६ मे रोजी पहिली फेरी जाहीर करण्यात येईल. या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांना २६ ते २८ मे या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. २९ मी रोजी रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येणार असून ३० मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; आतापर्यंत ७ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी केली नाेंदणी
- Advertisement -


