पेट्रोलियम उत्पादनांचा जपून वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. मात्र, या आवाहनावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोदींच्या ‘दुटप्पीपणा’वर सडकून टीका केली आहे. “जनतेला उपदेश आणि स्वतःसाठी कोट्यवधींचा लवाजमा, हा दुटप्पीपणा नाही का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हैदराबाद येथे ९,४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून इंधनाचे दर वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी देशाला ‘काटकसरीचा मंत्र’ दिला.
पंतप्रधानांच्या या भाषणावर अंजली दमानिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी पंतप्रधानांच्या विमान दौऱ्यांवर आणि सुरक्षेवर होणाऱ्या खर्चावर बोट ठेवले. “पंतप्रधानांच्या घोषणांनी आश्चर्य वाटले. पंतप्रधान स्वतः एका दिवसात चार्टर्ड विमानाने हैदराबाद, बेंगळुरू आणि गुजरातचे दौरे करतात. ४० ते ५० गाड्यांचा ताफा आणि एसपीजी सुरक्षेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात,” अशी टीका दमानिया यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या की, सामान्य जनतेला मेट्रोने प्रवास करा, कारपूल करा, सोने खरेदी करू नका आणि इंधन वाचवा, असा उपदेश दिला जातो. मात्र, हीच तत्त्वे स्वतःला लागू का नाहीत? “साहेब, Zoom App अजूनही चालू आहे. रॅली, सभा आणि भाषणांसाठी त्याचा वापर करता येतो. जनतेसाठी काटकसर आणि स्वतःच्या पक्षासाठी उधळपट्टी? हा दुटप्पीपणा नाही का?” असा रोखठोक प्रश्न त्यांनी विचारला आहे.
https://x.com/anjali_damania/status/2053541964927353243?s=20


