महिला व बाल कल्याण मंत्री आदीती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाडांवर विभागातील अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप लावत मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. गायकवाड हे पदाचा गैरवापर अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा तसेच आर्थिक व्यवहार आणि ब्लॅकमेलिंग करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संतोष भोसले यांनी यासंदर्भात चौकशी करून गायकवाड यांना तातडीने पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे.
राजेश गायकवाड हे मागील साडेसहा वर्षापासून महिला व बालविकास विभागात मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून काम करतात. तीन मंत्री बदलले, सरकार बदलली तरी ते विभागात कायम आहेत. गायकवाड हे अधिकाऱ्यांवर चुकीचे कामे करण्यास दबाव टाकत असून महिला अधिकाऱ्यांसोबत असभ्य वर्तणूक करतात. महिला अधिकाऱ्यांसोबत लज्जास्पद वर्तन करून, अश्लील, घाणेरड्या शब्दांचा वापर करतात. गायकवाड स्वत:च्या पदाचा गैरवापर करून मंत्र्यांच्या उपरोक्ष गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन करतात.खोटा तपशील कथानक स्वरूपात मांडणी करून प्रशासकीय कारवाई करण्यासाठी दबाव टाकतात. आर्थिक, मानसिक शोषण व अवमानास्पद वागणूक देत आहेत.
अनेक प्रकरणात कोट्यवधी रुपयांची आर्थिक मागणी व वसुलीसाठी पदाचा दुरुपयोग करतात. गायकवाड हे विभागातील विशिष्ट अधिकाऱ्यांना व्यावसायिक दृष्ट्या अपमानास्पद बागणूक देऊन, त्यांची उदाहरणे इतरांना दाखवून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात. विभागाकडील बदल्या व प्रतिनियुक्तीत त्यांनी स्वतःची एक समांतर यंत्रणा तयार केली असून त्या माध्यमातून ते अनेक अधिकाऱ्यांचे आर्थिक शोषण, बदनामीकारक कथानक तयार करतात, प्रतिसाद न देणाऱ्या अधिकाऱ्यांना अत्यंत गैरसोयीचे व विपरीत पदस्थापना दिली जाईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. स्वतःचे आर्थिक हीत जोपासण्यासाठी काही त्रयस्थ व्यक्ती व अधिकारी यांना हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करतात.
नियमबाह्य, बेकायदेशीर कृतीमध्ये सहभागी होण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करून त्यांचे व्यावसायिक आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. अनेक अधिकाऱ्यांना तक्रारी असल्याच्या धमक्या देतात व त्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करतात. तक्रारीतील मुद्द्यांचे कागदोपत्री पुरावे तसेच पुष्टीदर्शक इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे उपलब्ध असल्याचेही भोसले यांनी लेखी निवेदनात स्पष्ट केले आहे. आस्थापनाविषयक बाबीतीत गायकवाड यांचे वर्चस्व असून सचिवालयातील एक कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी एक समांतर नियंत्रणा उभी केली केल्याचीही चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.या आरोपाबाबत राजेश गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले की, या पत्रातील सर्व आरोप पूर्णपणे निराधार असून त्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र या विषयाची नोंद घेतली असून माहिती घेत असल्याचे ते म्हणाले.
मंत्री आदिती तटकरेंच्या खासगी सचिवावर अधिकाऱ्यांचे गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
- Advertisement -


