राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. सरकारकडून ३० जूनपर्यंत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीची प्रक्रिया लांबणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. या सर्व चर्चांदरम्यान राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती दिली आहे.
कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकरी कर्जमाफीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य निर्णय घेतील, थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल. ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.”
राज्य सरकारच्या या योजनेत केवळ थकबाकीदार शेतकरीच नव्हे, तर वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.
विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी रखडणार अशी चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री भरणे यांनी दिलासा दिला आहे.


