राज्यातील हवामानात हळूहळू बदल होत असून जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व स्वरूपाचा असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान १ जूनपासून वादळी पावसाचा अंदाज असला तरी किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे IMD ने म्हटले आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेश या भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. कोकण किनारपट्टीवरही काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मे महिन्याच्या तुलनेत तापमानात काही प्रमाणात घट होणार असली तरी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर राहण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सध्या होत असलेल्या वादळी पावसाचा मान्सूनशी थेट संबंध नाही. मान्सून अद्याप केरळात पूर्णपणे दाखल झालेला नसल्याने महाराष्ट्रातील बहुतांश भागात त्याचे आगमन किमान १० जूनपर्यंत होणार नसल्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्यांच्या जवळ उभे राहू नये. तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनची नियमित प्रगती लक्षात घेऊनच पुढील कृषी निर्णय घ्यावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


