रविंद्र चव्हाण यांनी नुकतंच विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीची अधिकृत भूमिका आणि रणनीती स्पष्ट केली. महायुतीमधील सर्व घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय असून, आम्ही अत्यंत ताकदीने ही निवडणूक लढवत आहोत. १८ जून रोजी होणाऱ्या मतदानात राज्यातील सर्वच्या सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून महायुतीसमोर अनेक मतदारसंघांमध्ये पक्षांतर्गत बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले होते. १८ जूनच्या मतदानापूर्वी पक्षाची मते फुटू नयेत म्हणून महायुतीने बंडखोरांना शांत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यावर बोलताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीमुळे आतापर्यंत ३ प्रमुख ठिकाणची बंडखोरी पूर्णपणे शमवण्यात महायुतीला यश आले आहे
तसेच ४ जून हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ज्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष किंवा बंडखोर म्हणून अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी वेळेपूर्वी वरिष्ठांशी बोलून आपले अर्ज मागे घ्यावेत, ही नम्र विनंती आहे. जे नेते पक्षाचा आदेश मानून मागे हटतील, त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा विचार केला जाईल. भविष्यात येणाऱ्या विविध शासकीय समित्या आणि महामंडळांच्या अध्यक्ष वा सदस्यपदासाठी त्यांच्या नावांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.


