सध्या राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. धरणं भरायला लागली आहेत. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे हा पाऊस आणखी किती दिवस असेल, असे विचारले जात आहे. याचे उत्तर हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी दिले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. रत्नागिरीपासून ते पालघरपर्यंत हा पाऊस असेल. 8 जुलैपर्यंत पासवाचा असाच पावसाचा जोर असेल. 9 तारखेनंतर मुंबईला सूर्यदर्शन घडेल. 9 तारखेनंतर पुणे, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी पाऊस कमी होईल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. याआधी त्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता, त्यांचा हा अंदाज खरा ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
राज्यात बऱ्याच भागात अजूनही पाऊस झालेला नाही. त्या भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बारामती, बीड, दौंड, उत्तर सोलापूर, सांगलीमध्ये जोरदार पावसाचे आगमन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण भागात थोडा पाऊस कमी असेल. 7 जुलैनं तर दक्षिण सोलापुरातही पाऊस होईल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले.
त्यानंतर लातूर, बीड, परभणी, धाराशीव, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगरातही बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे. आणखी दोन दिवस मराठवाड्यात पाऊस असेल. मराठवाड्यात 8 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होईल. 9 तारखेला हवामान साधारण असेल. विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या भागात आणखी दोन दिवस म्हणजे 7 जुलैपर्यंत पाऊस असेल, असे पंजाबराव डख म्हणाले आहेत.


