राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचं एनडीएमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये. अशा प्रकारच्या बातम्या आणि अफवा पसरवणं ही भाजपची राजकीय कार्यपद्धती असल्याचा आरोप त्यांनी केला.संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात सातत्याने अशा अफवा पसरवल्या जात आहेत. आमचे सहा खासदार पक्ष सोडून गेले. ते पैशांच्या जोरावर शिंदे गटाने फोडले असून ते गद्दार आहेत. रोज ‘आमदार फुटणार’, ‘पक्ष फुटणार’ अशा बातम्या पसरवल्या जातात. मात्र काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीला आमचे सर्व आमदार उपस्थित होते.”ते पुढे म्हणाले, “शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये जाईल किंवा त्यात विलीन होईल, ही शक्यता मला अजिबात वाटत नाही. मी त्यांच्या विचारसरणीला जितकं ओळखतो, त्यानुसार ही गोष्ट पूर्णपणे अशक्य आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं आणि देशात इंडिया आघाडीचं राजकीय भविष्य उज्ज्वल दिसत आहे.”एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूमिकेवरही राऊत यांनी टीका केली. “शिंदे स्वतःचा पक्ष भाजपपेक्षा मोठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आव्हान आहे. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा इतकी वाढली आहे की, भविष्यात ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही आव्हान देतील,” असा दावा त्यांनी केला.
आमदार फुटण्याच्या चर्चांवर राऊत म्हणाले की, काल शिवसेनेच्या २० पैकी १९ आमदारांनी मातोश्रीवरील बैठकीला हजेरी लावली. परभणीचे आमदार जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत राम मंदिरातील कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावर पक्षाने घेतलेल्या भूमिकेचे सर्व आमदारांनी स्वागत केल्याचं त्यांनी सांगितलं.
शरद पवार कधीच एनडीएमध्ये जाणार नाहीत; खासदाराचा मोठा दावा
- Advertisement -


