महावितरणच्या हलगर्जीपणामुळे बालिकेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
अभियंता, ठेकेदारासह चौघांविरुद्ध कोतवालीत गुन्हा दाखल
अहिल्यानगर : प्रतिनिधी
शहरातील आनंदनगर भागात महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एका 10 वर्षीय बालिकेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. 6 जुलै रोजी दुपारी घडली. या प्रकरणी महावितरणचे अभियंता, ठेकेदारासह चौघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंदनगर भागात खेळत असताना चिमुरडीचा हात महावितरणच्या उघड्या विजेच्या खांबाला लागला. खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने तिला जोरदार शॉक बसला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात धडक आंदोलन केले. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनानंतर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भास्कर सिताराम कोळे (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
1. विद्युत ठेकेदार झगडे – मे. तनिष्का
2. वरिष्ठ तंत्रज्ञ शरद काकडे
3. विद्युत सहाय्यक स्वप्नील ईश्वरकर
4. सहाय्यक अभियंता विनोद पांढरे
कर्तव्यात कसूर करून निष्काळजीपणा दाखवल्यामुळे या बालिकेचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आमदार जगताप यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतरच कंपनीने गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली. संबंधितांवर कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर आणि सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


