मध्य प्रदेशातील रीवा येथील भाजपा खासदार जनार्दन मिश्रा यांनी केंद्राच्या इथेनॉल-मिश्रित पेट्रोल धोरणाचं जोरदार समर्थन करत एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. “शुद्ध पेट्रोल काय तुमच्या वडिलांच्या घरातून येणार का?” असा थेट सवालच जनार्दन मिश्रा यांनी टीका करणाऱ्यांना विचारला. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
देशात फक्त २० टक्के तेल तयार होतं
केंद्राच्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या मोहिमेचं समर्थन करताना मिश्रा यांनी युक्तिवाद केला की, भारत कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भारताला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यापैकी केवळ २० टक्के तेल देशात तयार होतं, तर उर्वरित ८० टक्के तेल आयात करावं लागतं. सध्याची भौगोलिक-राजकीय परिस्थिती आणि कच्चे तेल वाहून आणण्यातील आव्हानांचा हवाला देत भाजपा नेत्याने सांगितलं की, भारताला पुरवठा करण्यासाठी तेल टँकरना कधीकधी १८०० किमीचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. मिश्रा म्हणाले, “अशा परिस्थितीत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाबद्दल बोलतात, तेव्हा काही लोक आंदोलन सुरू करतात.”
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या वडिलांच्या घरातून येणार का?
इथेनॉल मिश्रणाला विरोध करणाऱ्यांवर टीका करत ते म्हणाले, “इथेनॉल चालणार नाही, शुद्ध पेट्रोलच चालेल, असा दावा करत एक आंदोलन सुरू आहे. शुद्ध पेट्रोल काय तुमच्या वडिलांच्या घरातून येणार का? देशात शुद्ध पेट्रोल नसेल तर ते कुठून येणार?” इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना होणाऱ्या विरोधावरही मिश्रा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भारताला पर्यायी इंधनाचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचं सांगितलं.


