राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देत सुमारे ३६ हजार कोटींची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलीय. या योजनेत ज्या शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत आहे, त्यांना दोन लाखाच्या मर्यादेत कर्जमाफी दिली जाणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. या योजनेतून सरकारनं ९४ हजार शेतकऱ्यांना वगळ्यात आल्याची माहिती समोर आलीय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यभरातील ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार २९ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. कर्जमाफी योजनेसाठी लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे कामही वेगात सुरू आहे. या महिनाभरात ८० टक्के शेतकर्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. या कर्जमाफीच्या योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात १७ लाख शेतकरी पात्र ठरल्याची माहिती राज्य कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलीय.
कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना ऑगस्ट महिना संपेपर्यंत मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचं कृषिमंत्री म्हणालेत. त्याचबरोबर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी योजनेतून किती शेतकऱ्यांना वगळण्यात आलंय. किती शेतकरी अपात्र ठरलेत? त्याची कारणे काय आहेत, याची माहिती दिलीय.
राज्यातील १३ लाख शेतकऱ्यांचे केवायसी पूर्म झालंय. लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल. तसेच कर्जमाफी निकष बदलले नाही, महात्मा फुले कर्ज माफीत ज्यांनी लाभ घेतलाय त्यांना देखील लाभ मिळेल. दरम्यान आयकर भरणाऱ्या ९४ हजार शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलंय. तर ४६ हजार शेतकऱ्यांना इतर कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आलंय.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेत ५० हजार ८०६ शेतकऱ्यांना मरनोत्तर कर्जमाफीचा लाभ मिळालाय. यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती आणि मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यात मराठवाड्यातील १८ हजार ७२३,
अमरावतीमधील ११ हजार९४६,
नाशिक विभागातील ७ हजार ६३९,
पुणे विभागातील ६ हजार ३२२,
कोकणातील १५६७,
नागपूर विभागातील ४ हजार ६०९ अशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आहे.


