सोनम वांगचुक यांनी गुरुवारी मध्यरात्री उशीरा आपलं बेमुदत उपोषण मागे घेतलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात उपोषण सोडलं. यावेळी NEET परीक्षेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र, सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं, तरी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन संपणार नसल्याचं अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या कोअर टीमला आज रात्री अटक होण्याची शक्यता असल्याचं आम्हाला कळलंय, अशी भीती अभिजीत दिपकेंनी आज व्यक्त केली आहे.
अभिजीत दिपकेंनी आज सकाळी जंतरमंतरवर आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी गुरुवारी दिवसभर आंदोलनस्थळी हजर नसल्याचं सांगून त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. आपली तब्येत फारच खालावली होती, असं ते म्हणाले. “मी माफी मागतो की काल मी पूर्ण दिवस इथे नव्हतो. माझी तब्येत खूप खराब झाली होती. रात्रभर मी सलाईनवर होतो. आत्ताच मी सगळ्या रक्तचाचण्या करून आलोय. पण ही चळवळ दुसऱ्या कशाहीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे”, अशी माहिती दिपकेंनी यावेळी दिली.
दरम्यान, सोनम वांगचुक यांचं उपोषण संपलं असलं, तरी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. “मला हा मेसेज द्यायचाय की काहीही झालं तरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण इथून हटणार नाही. जेवढे लोक हा व्हिडीओ बघतायत, त्या सगळ्यांनी जंतर मंतरवर यावं. इथे येऊन बसावं. तोपर्यंत जंतरमंतर मोकळं होणार नाही, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान त्यांची खुर्ची सोडत नाहीत”, असा निर्धार अभिजीत दिपकेंनी व्यक्त केला.
दरम्यान, आम्हाला आज अटक होणार असल्याची शंका दिपकेंनी यावेळी व्यक्त केली. “आज रात्री कदाचित कॉक्रोच जनता पार्टीच्या टीममधल्या सगळ्यांना अटक करणार आहेत. माझं सरकारला म्हणणं आहे की अटक का करायची आहे? ३५ दिवसांपासून आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत आहोत. एवढं शांततापूर्ण अंदोलन स्वतंत्र भारतात कधी झालं असेल असं मला वाटत नाही. आम्ही संविधानाच्या मार्गाने चालणारे लोक आहोत. तुम्हाला भारताच्या संविधानाची काय समस्या आहे?” असा सवाल दिपकेंनी उपस्थित केला.


