नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची रिक्त जागा भरली जाणार असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या या जागेवर आता महायुतीतच मोठी रस्सीखेच रंगण्याची चिन्हे आहेत.
या मतदारसंघावर दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी सलग दोनदा विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम ठेवला होता. मात्र, राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, त्यानंतर महायुतीची झालेली नव्याने उभारणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बदललेले संख्याबळ यामुळे आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटकडून माजी आमदार राहिलेले चंद्रशेखर घुले हे गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुक आहेत. परंतु निवडणूक जाहीर होत नसल्यामुळे त्यांची जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदावर वर्णी लागली. दरम्यान नुकतेच झालेल्या राहुरी पोटनिवडणुकीत देखील अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कातून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपला अनुकूल भूमिका घेत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपचे अक्षय कर्डिले यांना विजय सहजसाध्य झाला. तनपुरे यांना विधान परिषदेसाठी शब्द मिळाल्याची जोरदार चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.
या मतदारसंघात आता भाजपचे संख्याबळ वाढलेले आहे. त्यामुळे पक्षाकडेच ही जागा असावी अशी आग्रही भूमिका जिल्हा भाजपकडून मांडली जाऊ लागली आहे.


