दिल्लीत काल देशभरातील तरुणांचा आक्रोश पाहायला मिळाला. सुरक्षा जवानांनी केलेला लाठीमार आणि अश्रुधुराचा माराही संतप्त तरुण वर्गाला थोपवू शकला नाही. त्यामुळे सोमवारी दिवसभर राजधानी दिल्ली तणावाखाली राहिली. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे अनेक आंदोलक जखमी आहे. या जखमी आंदोलकांशी आज अभिजीत दिपके यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काल झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली. याबाबत त्यांनी एक्स पोस्टही केली आहे.
“मी आमच्या सर्व समर्थकांची, विशेषतः पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाण झालेल्या मुलींची माफी मागतो. आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. दिल्ली पोलिसांच्या या अमानुष कृत्यांपासून तुमचं रक्षण करण्यासाठी मी अधिक प्रयत्न करू शकलो असतो”, असं अभिजीत दिपके म्हणाले.“२० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या एका धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यासाठी सरकार आणखी अनेक तरुण विद्यार्थ्यांचे रक्त सांडायला तयार होते. जर तुम्ही जखमी झाला असाल आणि हा संदेश पाहत असाल, तर कृपया मला DM करा. मला तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलायचं आहे आणि तुमची माफी मागायची आहे. आम्ही तुमच्या सर्वांसाठी लढत राहू”, असं अभिजीत दिपके म्हणाले.‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी जंतर-मंतरवर ठिय्या दिला होता. कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी-तरुण म्हणजेच ‘जेन झी’ सहभागी झाले होते. केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने ‘सीजेपी’ने सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. या मोर्चात सहभागी होत दुपारी बाराच्या सुमारास संसदेसमोरील रायसीना रोडवरून हजारो आंदोलकांचा जथा घोषणाबाजी करत अवघ्या काही मिनिटांत संसदेच्या प्रवेशद्वारावर पोहोचला.


