एलपीजी सिलिंडरच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असतानाच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. भविष्यात स्वयंपाकासाठी एलपीजीऐवजी इथेनॉलवर चालणारे स्टोव्ह वापरले जाऊ शकतात आणि हा पर्याय अधिक स्वस्त तसेच पर्यावरणपूरक ठरेल, असा दावा गडकरी यांनी केला.
नागपुरात नुकत्याच झालेल्या ‘मित्रों के बीच’ या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
त्यांनी भारताने पेट्रोलियम इंधनावरील अवलंबित्व कमी करून हरित आणि स्वदेशी इंधनाकडे वळण्याची गरज अधोरेखित केली.
इथेनॉल हे ऊस, मका, धान्य किंवा जैविक कचऱ्यापासून तयार होणारे जैवइंधन आहे. सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वापरले जाते. मात्र आता स्वयंपाकासाठीही त्याचा वापर करण्याचा प्रयोग सुरू आहे. इथेनॉल स्टोव्हमध्ये विशेष तंत्रज्ञानाद्वारे इंधन जाळून उष्णता निर्माण केली जाते.
गडकरी यांनी कार्यक्रमात सांगितले की, ‘पाण्यात सात टक्के इथेनॉल मिसळल्यावर स्टोव्हसारखी ज्वाला तयार होते. हा पर्याय एलपीजी सिलिंडरपेक्षा स्वस्त पडू शकतो.’ त्यांनी हा प्रयोग पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असल्याचाही दावा केला.
सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. दुसरीकडे भारताला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करावे लागते.
सध्या या स्टोव्हचे तंत्रज्ञान चर्चेत असले तरी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र गडकरी यांच्या वक्तव्यानंतर या प्रकल्पाबाबत उत्सुकता वाढली आहे.


