अहिल्यानगरडी-आर्थिक अडचणीमुळे विक्रीस काढलेल्या ट्रकच्या व्यवहारात ठरलेली रक्कम न देता ट्रक घेऊन गेल्याप्रकरणी तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक, धमकी व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 10 लाख 50 हजार रुपयांची रक्कम अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी ज्ञानेश्वर चांगदेव सानप (वय 35, रा. सानपाडा, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैष्णवी बन, भरत कारभारी बन (दोघे रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) आणि शिवाजी बांगर (रा. सावेडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा ट्रक (एमएच-15-वाई-7000) त्यांनी टीव्हीएस फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन खरेदी केला होता. मात्र आर्थिक अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी हा ट्रक विकण्याचे ठरविले. या व्यवहारात संशयित शिवाजी बांगर यांनी मध्यस्थी केली होती.
यानुसार ट्रकची किंमत 12 लाख 50 हजार रुपये ठरविण्यात आली. व्यवहारावेळी संशयित आरोपींकडून फिर्यादीला 2 लाख रुपये रोख देण्यात आले. त्यानंतर आणखी 1 लाख रुपये पुढील तारखेला रोख देणे, तर उर्वरित 9 लाख 50 हजार रुपये टीव्हीएस फायनान्स कंपनीच्या कर्जाचे हप्ते भरून फेडणे, असे ठरले होते. मात्र संशयित आरोपींनी 2 लाख रुपये दिल्यानंतर उर्वरित ठरलेली रक्कम फिर्यादीला दिली नाही. तसेच फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्तेही भरले नाहीत. आरोपी ट्रक घेऊन गेल्यानंतर फिर्यादीने कर्जाचे हप्ते भरण्याबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.


