शहरी व ग्रामीण भागात प्राणीक्लेश नियंत्रण उपाययोजना प्रभावीपणे राबवा
– जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर, – जिल्ह्यात भटक्या प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या, अपघातांचे प्रमाण, नागरिकांची सुरक्षितता, तसेच प्राणीक्लेशासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत शहरी व ग्रामीण भागांमध्ये प्राणीक्लेश नियंत्रण उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय प्राणीक्लेश प्रतिबंध समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
या बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील, नगरपालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त अभिजीत हराळे तसेच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी शैक्षणिक संस्था, न्यायालये, बसस्थानके व रेल्वे स्थानकांमध्ये भटक्या श्वानांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक कुंपण, सीमा भिंती, दरवाजे तसेच अन्य संरचनात्मक उपाययोजना करून परिसर सुरक्षित करावा. भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण व जंतनिर्मूलन करणे, निवाऱ्याची सोय करणे व बांधण्यासाठी निश्चित जागा उपलब्ध करून देणे, तसेच तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन सुरू करून ती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील महामार्ग व द्रुतगती मार्गांवर भटकी गुरे अथवा पशू दिसल्यास त्यांना अधिकृत आश्रयस्थाने, गोशाळा किंवा गोठ्यात हलविण्यात यावे. भटक्या जनावरांमुळे अपघात झाल्यास अथवा नागरिकांना भटकी जनावरे रस्त्यावर आढळल्यास त्वरित तक्रार करता यावी, यासाठी सर्व प्रमुख मार्गांवर नियमित अंतरावर हेल्पलाईन क्रमांक स्पष्टपणे प्रदर्शित करण्यात यावा. हा क्रमांक स्थानिक पोलीस विभाग व जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडण्यात यावा. जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये अँटी रेबीज लस आणि इम्युनोग्लोबुलिनचा आवश्यक साठा उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या इतर सर्व निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
******


