IPL 2026 मधील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचे जेतेपदाचे स्वप्न भंगले आहे. गुजरात टायटन्सने राजस्थानचा 7 गडी राखून पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आता 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होईल. मात्र, या मोठ्या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार रियान पराग मैदानावरील त्याच्या एका वर्तनामुळे चांगलाच ट्रोल होत आहे.
राजस्थानकडून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने अवघ्या 47 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 96 धावांची वादळी खेळी केली. दुर्दैवाने तो सलग दुसऱ्या सामन्यात ‘नर्वस नाइंटीज’चा बळी ठरला. वैभव बाद होऊन जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा कर्णधार रियान पराग त्याला भर मैदानात रागावताना आणि झापताना दिसला.
सोशल मीडियावर याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पराग त्याला ‘अशा पद्धतीने बाद व्हायला नको होते’ असे सांगताना दिसत आहे, तर बिचारा वैभव मान खाली घालून त्याचे बोलणे ऐकत आहे.
सामन्यानंतर बोलताना कर्णधार रियान परागने पराभवाचे खापर काही महत्त्वाच्या चुकांवर फोडले. ““पहिल्या डावात खेळपट्टीवर गोलंदाजांना चांगली मदत मिळत होती. चेंडूला ग्रिप मिळत होती. मात्र दुसऱ्या डावात जड रोलरमुळे फलंदाजीसाठी परिस्थिती अधिक चांगली झाली. मला वाटतं 240 धावांच्या आसपासचा स्कोअर असता, तर गुजरातसाठी आव्हान खूप मोठं ठरलं असतं.
यंदाच्या सीजनमध्ये वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्ससाठी कमाल कामगिरी केली. त्याने 776 धावा केल्या. 48.5 च्या सरासरीने त्याने फलंदाजी केली. त्याने सर्वाधिक 72 सिक्स मारले. त्याचा स्ट्राइक रेट 237.31 चा होता. इतकी शानदार कामगिरी केल्यानंतर जर एखाद्या खेळाडूची टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली नाही, तर दु:ख होणं स्वाभाविक आहे. वैभव सूर्यवंशी मागच्या चार सामन्यात तीनवेळा निराश झाला. त्याची तीन शतकं हुकली. लखनऊ विरुद्ध तो 93 रन्सवर आऊट झाला. हैदराबाद विरुद्ध 97 आणि गुजरात विरुद्ध 96 धावांवर. म्हणजे थोडक्यात त्याची तीन शतकं हुकली.


