काँग्रेसच्या दिल्लीतील आंदोलनामुळे देशातील राजकारण तापलंय. केंद्रातील भाजप सरकारला चांगलेच कोंडीत पकडलंय. कांँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सरकार बॅकफूटवर जात असल्याचं दिसतंय. परंतु दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. तीनवेळा विधानसभा लढवणाऱ्या एका बड्या नेत्यानं पक्षाचा तडकाफडकी राजीनामा देत दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्णसिंह गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ते आज अधिकृतपणे वारणानगर येथे पक्षप्रवेश करणार आहेत.
कर्णसिंह गायकवाड यांनी याआधी काँग्रेसच्या उमेदवारीवर तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवलीय. शाहूवाडी तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क असून कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे. आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. दरम्यान वारणा येथे होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनय कोरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कर्णसिंह गायकवाड यांच्या पक्षांतरामुळे शाहूवाडी तालुक्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


