नाशिकमधील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गोकुळ गिते यांनी मैदान मारले होते. ते महायुतीला चांगलेच नडले होते. त्यांचे मन वळविण्याचा आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना निवडून आणण्याचा आटापीटा करण्यात आला होता. पण गोकुळ गिते हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले होते. निवडणुकीनंतर कथित आर्थिक व्यवहार आणि मतदारांना पैसे वाटपाच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत गोकुळ गिते यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यांची मिन्नतवार करताना महायुतीचे नाकीनऊ आले होते. संकटमोचक मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत हे दोघेही अखेरपर्यंत नाशकात तळ ठोकून होते. गोकुळ गिते यांच्या भावाने उमेदवारी मागे घेतली होती तर त्यांनी उमेदवारी कायम ठेवली होती. महायुतीला ते चांगलेच नडले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. महायुतीला हा मोठा धक्का होता. त्यानंतर लागलीच गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा चेकमेट देण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत होता.
नाशिक विधान परिषद निवडणुकीतील कथित पैशांच्या वाटपाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारीतील प्रत्येक मुद्द्याची सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत. या नवीन अपडेटमुळे नाशिक जिल्ह्यात आता चर्चेला पेव फुटले आहेत.


