राज्यात सध्या पावसाळी हवामान असून अनेक भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची नोंद होत आहे. तर काही भागात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यावर वादळाचा प्रभाव राहणार असून राज्यात मंगळवारी अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान मेघगर्जनेसह ताशी ३० ते ४० किलोमीटर सोसाट्याचा वारा, गारपीट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सध्या राज्यात पश्चिमी विक्षोभाची (वादळाची) स्थिती असून तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्यात पावसाळी हवामान आहे. राज्यात सोमवारपासून पावसाचा प्रभाव वाढला असून यामुळे बहुतांश भागात पावसाची नोंद होत आहे,
कोकण प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मंगळवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून या प्रदेशातील काही भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यातील काही भागात पुढील दोन दिवसात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात मंगळवारी एकीकडे पावसाळी हवामान, तर विदर्भातील अमरावती आणि वर्धा या भागात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती राहील, अशी शक्यता हवामान विभगाने वर्तविली आहे. यामुळे सध्या राज्यात अस्थिर हवामान आहे. यंदा ‘एल निनो’ची स्थिती प्रशांत महासागरात निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभाग आणि खाजगी हवामान संस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे देशासह राज्यातही पावसाचे प्रमाण सरासरीहून कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अस्थिर हवामानचा फटका नागरिकांसोबतच मुख्यतः राज्यातील शेतकऱ्यांना बसत असून यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे.
कोकण पट्ट्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग. सांगली, सोलापूर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर आदी भागांना पावसाचा इशारा देण्यात आला असून यासाठी हवामान विभागाकडून मंगळवारसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.


