महाविकास आघाडीचा निश्चयनामा म्हणजे अहिल्यानगरच्या पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा – अभिषेक कळमकर
काल झालेल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महाविकास आघाडीच्या निश्चयनामा प्रकाशन कार्यक्रमात बोलताना माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सत्ताधारी हुकूमशाही पद्धतीचे राजकारण करत असून शासकीय व स्वायत्त संस्था, विशेषतः मनपा आयुक्त, हे स्थानिक आमदाराच्या ताटाखालचे मांजर असल्यासारखे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सध्या सत्ताधाऱ्यांना पराभवाची इतकी भीती वाटू लागली आहे की त्यांनी आमच्या उमेदवारावर कट्टा दाखवून दादागिरी केल्याचा गंभीर आरोपही कळमकर यांनी यावेळी केला. अशा प्रकारच्या दहशतीच्या राजकारणाला जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या कार्यकाळाचा उल्लेख करताना कळमकर म्हणाले की, अवघ्या २३ व्या वर्षी महापौर असताना त्यांनी ४० कोटी रुपयांचा निधी शहरासाठी आणला आणि पुढील ३० वर्षांचे दृष्टीकोन ठेवून विकासकामांचे नियोजन केले. मात्र, केवळ ११ महिन्यांचा कार्यकाळ मिळाल्याने अनेक कामे अपूर्ण राहिली.
आता जाहीर करण्यात आलेला महाविकास आघाडीचा निश्चयनामा हा अहिल्यानगरच्या पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा असून शहराला आधुनिक आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने नेणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


