राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंगळवारी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) ‘साईडलाईन’ झालेले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोघेच चर्चेचा विषय ठरले. पण, प्रफुल पटेल हे मुंबईत असूनही त्यांनी बैठकीला अनुपस्थिती दाखवली. आता प्रफुल पटेल बैठकीला का आले नाहीत? याची चर्चा सुरु आहे.
हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. वहिनींच्या शपतविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. परंतू संपूर्ण पक्ष एकसंग असल्यामुळे आणि त्यावेळी देखील वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे त्या वेळी या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आले त्याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली हे खरं आहे. पुढे ते म्हणाले की, मी म्हटलं तर पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे. प्रफुलभाई आपल्या कामानिमित्त गेले होते त्यामुळे गैरहजर होते.
तटकरे म्हणाले की, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणे, पक्ष एकसंध ठेवणे यात मी आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्यानंतर उदभवलेल्या स्थितीमधे आमच्या दोघांवर टीका सुरु असताना पक्षाचा एकही आमदार अथवा नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही. याशिवाय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुनही मी आणि पटेल दोघेच टीकेच्या तोफेच्या तोंडी गेलो. त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही पुढे येऊन आमची बाजू मांडण्याचा किंवा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनीच टीकेचे धनी का व्हायचे? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही?
तटकरेंचा सवाल ऐकल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. जे झालं ते झालं, आता त्यावर अधिक चर्चा न करता पुढे जाण्याची गरज आहे, असे भुजबळ यांनी म्हटले. मात्र, तटकरे यांनी भुजबळांच्या प्रयत्नाला न जुमानता आपले बोलणे सुरुच ठेवले. या सगळ्यामुळे राष्ट्रवादीच्या बैठकीत तणाव निर्माण झाला आहे. तसेच सुनील तटकरे बोलण्यासाठी उभे राहताच पार्थ पवार हे तेथून तडकाफडकी निघून गेले.


