अहिल्यानगर-गाव पातळीवरील राजकारणात महत्त्वपूर्ण असणाऱ्या सरपंच पदाचे आरक्षण आता पुन्हा एकदा नव्याने जाहीर केले जाणार आहेत. २३ व २४ जुलै रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपूर्वी सरपंच आणि उपसरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले जाते. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका घेतल्या जातात. दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यावेळी सुटलेल्या आरक्षणानंतर अनेकांचा हिरमोडही झाला होता. काहीजणांमध्ये आनंदाचे वातावरण होते.मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणात बदल केला जाणार असून, राज्य शासनाने नव्याने आरक्षण जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात महिला, सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण निघणार याचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने तयार करून मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांना पाठवला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया या कार्यक्रमाला मान्यता दिल्यानंतर २३ आणि २४ जुलै रोजी उपविभागीय पातळी आणि तहसील कार्यालय पातळीवर सरपंच पदाच्या सोडती काढण्यात येणार आहे.
६२४ ठिकाणी सरपंचपद खुले
२०२५ ते २०३० या पाच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील १ हजार २२३ ग्रामपंचायत पैकी ६२४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. यात ३१२ ठिकाणी महिलांचा समावेश असणार आहे. यासह ३३० ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींसाठी सरपंच पदाचे आरक्षण राहणार असून यात १६५ महिलांना संधी मिळणार आहे. तर ११९ ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण राहणार असून यात ६० ठिकाणी महिला, तसेच दीडशे ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण राहणार असून यात ७५ महिला सरपंच यांचा समावेश राहणार आहे.


