माजी मंत्री तथा भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे निधन झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेची जागा ही रिक्त झाली होती. या पोटनिवडनुकीसाठी अक्षय कार्डीले यांना भाजपने उमेदवारी दिली. तसेच त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे हे देखील उभे राहणार होते. मात्र ऐन निवडणुकीचा अर्ज भरण्याच्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली.
त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तनपुरे यांचे फोनद्वारे बोलणे झाल्याने तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याने अक्षय कर्डीले यांचा ही निवडणूक जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा ह्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. येत्या २० एप्रिल रोजी तनपुरे आपली अंतिम भूमिका जाहीर करणार आहेत.
प्राजक्त तनपुरे यांनी आपली पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी २० एप्रिल रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. विशेष म्हणजे, त्याच दिवशी राहुरीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यामुळे तनपुरे हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मी २० एप्रिल रोजी कार्यकर्त्यांशी संवाद साधून माझी भूमिका स्पष्ट करेन. महाविकास आघाडीचे नेते मला भेटत असले, तरी योग्य वेळी मी माझा निर्णय जाहीर करेन. असे तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तनपुरे यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. तनपुरे नेमका कोणाचा प्रचार करणार की तटस्थ राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजप नेत्यांनी “तनपुरे सोबत आले तर आम्हाला आनंदच होईल” असे म्हणत त्यांचे स्वागत करण्याचे संकेत दिले आहेत.


