राज्यात मान्सून दाखल झाला आहे, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत देशासह राज्यात उशिराने मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, परंतु अजूनही मान्सूनने तळ कोकणच सोडलेलं नाहीये. त्यामुळे राज्यातील इतर भागांमध्ये पाऊसच झालेला नाहीये. यंदा जूनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिअल्प पाऊस झाला आहे. पाऊस नसल्याने पेरण्यांना विलंब झाला असून, शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र आता ही प्रतिक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) येत्या 25 तारखेपासून राज्यातील विविध भागात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये हळुहळु मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होईल आणि 25 जून ते 30 जून दरम्यान राज्यात जोरदार पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा देखील मान्सूनबाबत नवा अंदाज समोर आला आहे.
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या नव्या अंदाजनुसार उद्या म्हणजे 21 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. मात्र त्यानंतर 22 जून पासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल, मान्सूनच्या पावसाला पूर्व विदर्भाकडून सुरूवात होईल, त्यानंतर हळुहळु मान्सून कोकण आणि मुंबई मार्गे संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. 22 जूनपासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल, पुढील काही दिवसांमध्येच आता मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल, 22 जून सोमवारपासून ते 30 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे.


