उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी आज (२२ जुलै) अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.बुधवारी अजित पवार यांची जयंती आहे, त्या निमित्ताने आम्ही कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्या यादीवर काम करत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भारणे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ ३० जुलैपूर्वी शेतकऱ्यांना दिला जाईल.
राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीककर्जाची परतफेड केली आहे, तसेच जे शेतकरी कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसतात, अशा पात्र शेतकऱ्यांची नावे या यादीत समाविष्ट असणार आहेत. सहकार विभागाने सर्व जिल्ह्यांमधील माहिती एकत्र करून ही यादी तयार केली आहे. आज ही यादी जाहीर झाल्यानंतर शेतकरी आपापल्या बँक शाखांमध्ये किंवा शासनाच्या अधिकृत पोर्टलवर आपले नाव तपासू शकतील.
या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार ई-केवायसी (e-KYC) पूर्ण झाले आहे, त्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग केली जाईल. ज्यांचे केवायसी बाकी आहे, त्यांना ते तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांमध्ये समाधान
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या यादीची वाट पाहत होते. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून सरकारने ही घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


