अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी २,२१५ कोटींची मदत जाहीर; मदतीचे निकष शिथिल…ओल्या दुष्काळाची शक्यता फेटाळली…

मुंबई : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून, त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. आतापर्यंत २,२१५ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. शनिवार व रविवारी राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाला खबरदारी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा आढावा घेण्याकरिता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत असली तरी तेवढा पाऊस झालेला नाही याकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लक्ष वेधण्यात आले.

राज्यात विशेषत: मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांसून होत असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जनजीवन उद्धस्त झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्यात गेली असून गावा- गावात पुराचे पाणी घुसल्यामुळे हजारो कुटुंब बेघर झाली आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आज मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यावेळी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याएवढा पाऊस झालेला नाही.

मात्र दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा लोकांना तातडीने मदत देण्यास सरकारचे प्राधान्य त्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. यापैकी १८२९ कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले असून येत्या ८ ते १० दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ही मदत जमा होईल. तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

पूरग्रस्त भागांतील पंचनामे पूर्ण होताच तातडीने मदत पोहोचवली जात आहे. ज्या तालुक्यांचे पंचनामे पूर्ण होतात, तिथे त्वरित आर्थिक सहाय्य वितरित केले जाते. एकत्रित शासन आदेशाची वाट न पाहता, पंचनामे येतील तसे मदतीचे शासन निर्णय काढण्यात येत आहेत. मदतकार्य कुठेही थांबलेले नाही . मृत्यू, जनावरांचे नुकसान, घरांचे नुकसान यांसारख्या दुर्दैवी घटनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत वितरित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवरही नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सूट देण्यात आली असून, निधीची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

धाराशिव, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. या भागांत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)च्या १७ तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत. अनेकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि निवाऱ्याची व्यवस्था सरकारने केली आहे. पूरामुळे जमिनी खरडून गेल्याच्या तक्रारींवर सरकार सकारात्मकपणे मदत करेल असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील आपत्तीग्र्स्तांना मदतीसाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असून तोवर राज्याने तातडीने मदत वाटप सुरु केले आहे. केंद्राची मदत मिळेलच, पण शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. काही भागांत अजूनही पाणी ओसरलेले नसल्याने स्थलांतरित नागरिकांना घरी परतता येत नाही. त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था सरकार पुरवत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारपासून अतिवृष्टीबाधित भागाचा दौरा करणार असून सर्व पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागांना भेटी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शनिवार-रविवार अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याने २७-२८ सप्टेंबरदरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अखंडपणे सुरू असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles