नीट पेपरफुटीप्रकरणी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर २६ व्या दिवशी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि ‘ॲपेक्स बॉडी ऑफ लेह’च्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी शुक्रवारी रात्री उपोषणाची सांगता केली.
देशभरात संभाव्य हिंसाचार टळावा आणि प्रशासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर काही महत्त्वाच्या अटींवर हे उपोषण मागे घेत असल्याचे वांगचुक यांनी स्पष्ट केले आहे.उपोषणाच्या सांगतेनंतर सोशल मीडियावर वांगचुक यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी अखेर २६ दिवसांनंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात विविध राजकीय पक्षांच्या ६५ खासदारांनी प्रत्यक्ष भेटून आणि पत्रांद्वारे मला उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. अनेक अटींवर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा मार्ग निवडला आहे. या सर्व अटींची सविस्तर माहिती मी लवकरच देशासमोर मांडेन.”
यावेळी त्यांनी देशवासीयांना शांततेचे आवाहन केले. “माझे सर्वांना आग्रहाचे सांगणे आहे की, देशात कुठेही आणि कोणत्याही स्वरूपाचा हिंसाचार होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे,” असे वांगचुक यांनी अधोरेखित केले.
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर CJP संस्थापक अभिजीत दिपके यांनी समाधान व्यक्त केले आहे. वांगचुक यांच्या भूमिकेचे स्वागत करताना दिपके म्हणाले, “सोनम सर, तुम्ही २६ दिवसांचे प्रदीर्घ उपोषण मागे घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही संपूर्ण देशाच्या सदसद्विवेकबुद्धीला जागे केले आहे. तुमचे आरोग्य आणि जीवन या देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे.”


